सिंदखेडराजा |राहुल नायर
अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म शेगाव निवासी, भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरहून परतीच्या प्रवासात विदर्भाच्या प्रवेशद्वारावर आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले. टाळ-मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांच्या वर्षावात पालखीचे अत्यंत उत्साहात व जंगी स्वागत करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव ते पंढरपूर असा सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून परतीच्या मार्गावर आहे. सुमारे दोन महिन्यांच्या या वारीत ७०० वारकरी, अश्व आणि ९ वाहनांचा सहभाग असतो. गेल्या ५७ वर्षांपासून ही वारी अखंडपणे सुरू आहे. २९ जुलै रोजी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेली पालखी विदर्भाच्या सीमेवर दाखल झाली.
पालखीसोबत वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, पोलीस प्रशासन, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच संस्थेचे पहारेकरी यांची व्यवस्था करण्यात आली होती. मार्गातील गावांमध्येही भाविकांकडून वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
विदर्भाच्या प्रवेशद्वारावर पालखीचे आगमन होताच आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे व जयश्री तायडे यांनी सपत्नीक श्रींचे पूजन करून दर्शन घेतले. प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अर्जुनराव ठोसरे यांच्यासह विविध अधिकारी, नगर परिषद पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी श्रींचे दर्शन घेतले.
सावरगाव माळ येथील सरपंच आणि ग्रामस्थांनीही पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांसाठी धान्याची मदत केली. ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पालखीच्या मार्गावर भक्ती आणि सेवाभावाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
जलशुद्धीकरण केंद्राजवळील हॉटेल तुळजाई परिसरात नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्या वतीने तब्बल ६० फुटांची भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. पालखी या ठिकाणी पोहोचताच दोन जेसीबीच्या साहाय्याने वारकऱ्यांवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. या उत्साहात वारकरी आणि भाविकही मोठ्या आनंदाने सहभागी झाले.
या स्वागत सोहळ्याला आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे, डॉ. सुनील कायंदे, भाग्यश्री खेडेकर, जिल्हा सरचिटणीस विजयभाऊ तायडे, राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराजे जाधव, युवा सेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे, उपनगराध्यक्ष संगीता म्हस्के, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, गटनेते ॲड. संदीप मेहेत्रे, दिलीप आढाव यांच्यासह नगर परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाचे युवा नेते अशोक मेहेत्रे, राष्ट्रवादीचे नेते शेख यासीन, राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन कायदे, सिद्धार्थ जाधव, शहराध्यक्ष वैभव मीनासे, शेख अजीम, धांदरवाडीचे सरपंच नितीन शेळके, श्याम जाधव, मारुती काकडे, युवक शहराध्यक्ष आरेफ चौधरी, ग्रामसेवक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रामदास बारवकर, माजी बांधकाम सभापती गणेश झोरे, माजी स्वच्छता व आरोग्य सभापती राजेंद्र आढाव, दीपक ठाकरे, मंगेश खुरपे, मंगेश बारवकर, मंगेश तायडे, आकाश तायडे, हॉटेल तुळजाईचे संचालक जगन्नाथ बापू देशमुख यांच्यासह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर पालखी जिजामाता नगर मार्गे रामेश्वर मंदिर परिसरात पोहोचली. रामेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थानचे अध्यक्ष बाळू म्हस्के, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, सचिव सचिन महाजन आणि सदस्यांनी पालखीचे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत केले.
भोजनानंतर पालखी नीलकंठेश्वर मंदिर, महात्मा फुले विद्यालय, काळा कोट आणि तहसील कार्यालयासमोरून जिजामाता महाविद्यालयाच्या परिसरात मुक्कामासाठी पोहोचली. तेथे जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळाजीशेठ तायडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखीच्या आगमनामुळे संपूर्ण शहराला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पालखीच्या सुरक्षित प्रवासासाठी पोलीस प्रशासनाकडूनही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी अर्जुनराव ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चापाईतकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, श्रावण डोंगरे आणि विकास राऊत यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.
पालखीच्या मार्गावर ५ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार, १० वाहतूक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय तीन पोलीस वाहने पालखीसोबत शेगावपर्यंत राहणार आहेत.
दोन महिन्यांचा वारीचा प्रवास पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी विदर्भात दाखल झाल्याने वारकरी आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. भक्ती, सेवा आणि श्रद्धेने भारलेल्या या वातावरणात ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने सिंदखेड राजा परिसर दुमदुमून गेला.
जिजामाता महाविद्यालयात मुक्काम केल्यानंतर श्रींची पालखी पहाटे ४ वाजता पुढील प्रवासासाठी किणगाव राजाच्या दिशेने रवाना होणार आहे. या पालखी सोहळ्यामुळे मार्गावरील गावांमध्येही भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
हेही वाचा :
- बुलढाण्यात खळबळ! ‘राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकू’चा आरोप; करमोड्याच्या सरपंचाचा मृत्यू ,आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ चर्चेत
- भक्तांनी श्रद्धेने दिलेले दानही सोडले नाही; मंदिरातील दानपेटी फोडणारा ४८ तासांत जेरबंद
- राहुलभाऊ गप्प… चिखलीच्या राजकारणात मात्र मोठ्या हालचाली; भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा ऐरणीवर
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी KattaNews.in ला भेट देत राहा.










