मलकापूर | ९ मार्च २०२६
सनई-चौघड्यांचे सूर, नातेवाईकांची लगबग आणि मंगलमय वातावरण… बुलढाणा जिल्ह्यातील अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात सुरू असलेला विवाहसोहळा अगदी रंगात आला होता. नवरीला हळद लागून पुढील विधी सुरू झाले होते. पाहुण्यांची गर्दी वाढत होती. मात्र काही क्षणांतच आनंदाच्या या वातावरणावर संकटाचे काळे ढग दाटून आले. अचानक मधमाश्यांच्या थव्याने लग्नमंडपावर हल्ला चढविल्याने मंगलमय वातावरणाचे रूपांतर क्षणात भीती, किंकाळ्या आणि धावाधावीत झाले.
या भीषण प्रकारात चार महिला व तीन पुरुष असे सात जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांवर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आज ८ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिर परिसरात दाभाडी येथील चोपडे परिवारातील नवरी आणि धरणगाव येथील चौधरी परिवारातील नवरदेव यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच मंदिर परिसरात लग्नाची लगबग सुरू होती. नवरी मुलीला हळद लावून पुढील विधी सुरू होते. मंडपात वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक आणि पाहुण्यांची मोठी गर्दी होती.
याच दरम्यान सुरुवातीला दोन-चार मधमाश्या मंडपात उडताना दिसल्या. लाल शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीच्या डोक्याभोवती त्या घोंगावू लागल्या. त्याने त्या हाताने हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणांतच जवळच्या झाडावरील मधमाश्यांचे मोठे पोळ उठले आणि हजारो मधमाश्यांच्या थव्याने थेट लग्नमंडपावर हल्ला चढविला.
क्षणातच लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. मधमाश्यांच्या भीषण हल्ल्याने महिला, मुले आणि वृद्धांसह सर्व पाहुणे जीव वाचवण्यासाठी धावू लागले. काहींनी मंदिर परिसरातून बाहेर पळ काढला, तर काहींनी झाडांच्या आडोशाला आसरा घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या मते हालचाल करणाऱ्यांनाच मधमाश्यांनी अधिक डंख मारले.
या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांना मोठ्या प्रमाणात मधमाश्यांनी डंख मारले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी एका जखमीच्या शरीरातून सुमारे एक हजार ते अकराशे तर दुसऱ्याच्या शरीरातून दीडशे ते दोनशे मधमाश्यांचे काटे बाहेर काढले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये मोठी भीती पसरली.
जखमींमध्ये नवरदेवाच्या वडिलांचाही समावेश आहे. जखमींना प्रथम अनुराबाद येथील डॉ. गोपाल लीलाकर यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर सात जखमींना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी तिघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान या घटनेत सुमारे २० ते २५ पाहुण्यांना मधमाश्यांचा डंख बसला असून काहींना किरकोळ दुखापत झाली. गावातील नागरिकांनी त्यांच्या अंगातील काटे काढून प्राथमिक उपचार केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, सरपंच ज्ञानदेव ढगे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली.
या अनपेक्षित घटनेमुळे काही काळ विवाह सोहळा विस्कळीत झाला. भीतीचे वातावरण निवळल्यानंतर पुढील विवाह सोहळा सोमेश्वर मंदिरावरून धरणगाव येथे हलविण्यात आला. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सरपंच ज्ञानदेव ढगे यांनी दिली.
Related News
- सुलतानपूर येथे बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
- मेहकरमध्ये धक्कादायक घटना! बुलढाणा मुख्यालयातील पोलिस नाईकाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप गूढ
- शिक्षक पत्नीचा सुपारी देऊन खून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.










