वाशिम|३ फेब्रुवारी २०२६
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आधीच अस्मानी-सुलतानी संकटांनी हतबल झाला असताना, आता वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. अडोळी परिसरात रानडुकरांनी शेतात घुसखोरी करत उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
अडोळी येथील शेतकरी गंगुबाई इढोळे यांच्या गट नंबर ४४० मधील जमिनीत पेरलेले गहू पिक रानडुकरांनी अक्षरशः उखडून खाल्ले आहे. मेहनतीने उगवलेले पीक काही तासांतच नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाकडून त्वरित अर्थसहाय्य मिळावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वन्यजीव विभाग व वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वनविभागाने तातडीने पंचनामा करून ७२ तासांच्या आत युद्धपातळीवर नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. सध्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचा असा हल्ला होत राहिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन त्वरित मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गंगुबाई इढोळे यांनी प्रशासनाशी बोलताना केली आहे.
📢 Katta News वर अपडेट राहा
अशाच शेतकरी प्रश्नांच्या, ग्रामीण भागातील ज्वलंत बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
हे पण वाचा.










