समाधान सरकटे/साखरखेर्डा
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा साखरखेर्डा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सामाजिक जीवनात कार्य करताना विचाराला कृतीची जोड दिली की प्रत्येक काम यशस्वी होते, असे मत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. आपण केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम केले पाहिजे. अशा नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, वृक्षमित्र स्व. मधूकर खंडारे यांच्या स्मरणार्थ तसेच दैनिक भारत संग्राम व माजी सैनिक अर्जून गवई यांच्या वाढदिवसानिमित्त ३० डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, तळागाळातील लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. जीवनात इतरांसाठी काहीतरी देण्याची भावना जोपासली तरच पुरस्काराचे खरे मोल कळते.
यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रा. संजय खडसे यांना प्रदान करण्यात आला. तर जेष्ठ पत्रकार अशोक इंगळे आणि माजी प्राचार्य डी.एन. पांचाळ यांना पत्रकारितेतील दीर्घ योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार, संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व छत्रपती शिवाजी महाराज बाल गौरव पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
हे पण वाचा..
पिंप्री गवळीत काळजाला चटका! घरातच १५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पत्रकार सचिन खंडारे, माजी सैनिक अर्जून गवई व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल सरकटे व वैशाली तायडे यांनी केले.
📢 तुमच्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवा
सामाजिक, शैक्षणिक किंवा प्रशासनाशी संबंधित बातम्या पाठवण्यासाठी आजच Kattanews.in शी संपर्क साधा.










