साखरखेर्डा : समाधान सरकटे
गोरेगाव शिवारात सौरऊर्जा केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत सात शेतकऱ्यांच्या शेतातील सौरऊर्जा प्रकल्पावरील केबल वायर चोरट्यांनी तोडून नेली असून, या प्रकारामुळे सौरऊर्जा प्रकल्पांचे नुकसान झाले आहे.
गोरेगावसह साखरखेर्डा, राताळी, मोहाडी, सवडद, गुंज, गुंजमाथा आणि सावंगी भगत परिसरातील शेतांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सौरऊर्जा प्रकल्पावरील केबल चोरीच्या घटना समोर येत आहेत. सौरऊर्जा प्रकल्पातून वीज जोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या वायर चोरट्यांकडून लक्ष्य केल्या जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या चार-पाच दिवसांत गोरेगाव शिवारातील अभिमन्यू इंगळे, गिरीश पांचाळ, प्रविण सखाराम गवई, जयदीप महाजन, सखाराम गिनाजी गवई, संगिता रमेश कव्हळे आणि विनायक पंचाळ यांच्या शेतातील सौरऊर्जा प्रकल्पावरील केबल वायर चोरट्यांनी तोडून नेली. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, सौरऊर्जा प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे.
रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेतातील सौरऊर्जा प्रकल्पांची केबल चोरीला गेल्यानंतर वीजपुरवठ्यावर परिणाम होत असून, शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांनी या चोरीच्या घटनांबाबत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव शिवारासह परिसरात सुरू असलेल्या सौरऊर्जा केबल चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
📲 महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
📰 संबंधित बातम्या










