साखरखेर्डा | ९ मार्च २०२६
अंधश्रद्धा निर्मूलन, ढोंगी बाबा, महिलांची फसवणूक आणि समाज सुधारणा या गंभीर मुद्द्यांवर सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी जोरदार प्रहार केला आहे. “महिलांनी ढोंगी बाबांच्या आहारी जाणे थांबवले नाही, तर समाज कधीच सुधारणार नाही,” असा थेट आणि स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या परखड वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये मोठी चर्चा रंगली.
महाराजांनी महिलांच्या अंधश्रद्धेवर थेट बोट ठेवत सांगितले की, “मुलं होत नाही म्हणून महाराज, पती सुख देत नाही म्हणून महाराज, संपत्ती हवी म्हणून महाराज… जर या सगळ्या गोष्टी बाबांच्या हातात असत्या, तर लग्न करण्याची गरजच काय उरली असती?” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
नाशिक जिल्ह्यातील एका ढोंगी बाबाच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे भोंदू लोक महिलांची फसवणूक करत आहेत. “कोणत्याही बाबाकडे योगसिद्धी नाही. महिलांनी अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराजांनी समाजातील अनाठायी प्रथा आणि खर्च यावरही भाष्य केले. “विवाहात अनावश्यक खर्च टाळा, सामूहिक विवाह करा. आई-वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा. तेच खरे विठ्ठल-रुख्मिणी आहेत,” असा भावनिक संदेश त्यांनी दिला.
तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांवर टीका करत त्यांनी सांगितले की, “हिंदू किंवा मुस्लिम खतरेमे नाहीत, तर राजकारण खतरेमे आहे. सर्वांनी मिळून मिसळून राहणे हीच खरी देशाची प्रगती आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले मंडळ आणि सावता ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
📢 हे आवश्यक करा
👉 अशाच ताज्या, धक्कादायक आणि समाजाला दिशा देणाऱ्या बातम्यांसाठी kattanews ला दररोज भेट द्या.










