मोताळा : प्रविण गरुडे
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा गावात गेल्या १५ दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात ४ ते ५ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, गावात पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आव्हा तसेच परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धामणगाव बढे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आव्हा गावात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
दरम्यान, नांदुरा तालुक्यातील काटी येथे चोरी करताना एका व्यक्तीचा खून झाल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आधीच मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यातच आव्हा गावातही चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात पोलिस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. गावात भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काही दिवस आव्हा गावात पोलिस बंदोबस्त किंवा पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
या निवेदनावर उबाठा युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, शिवसेना तालुका प्रमुख विजय इंगळे, संतोष घोंगटे, अॅड. विवेक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, देवानंद पाटील, अनिल पाटील, मोहन पाटील, प्रकाश घोंगटे, शालिग्राम पाटील, सुदाम घोंगटे, संदिप पाटील, सुधाकर कुकळे, उमेश घोंगटे, गजानन कुकळे, योगेश महाजन, परमेश्वर मानकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
📲 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या स्थानिक बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
📰 Related Crime News










