बुलढाणा |भागवत गायकवाड
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून या जंगलात एकटेपणाने वावरणाऱ्या ‘धुरंधर’ या नर वाघाला अखेर जोडीदार मिळाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘मोना’ नावाची वाघीण रविवारी २६ जुलैच्या मध्यरात्री विशेष बंदोबस्तात ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाली.
बुलढाणा, खामगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ संवर्धनाला चालना देण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ‘मोना’च्या आगमनामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.
यापूर्वी ३ जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून तरुण नर वाघ ‘धुरंधर’ याला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात त्याला सुरक्षित तारकुंपणाच्या परिसरात ठेवण्यात आले. परिसराशी जुळवून घेतल्यानंतर धुरंधरने स्वतःहून जंगलात प्रवेश केला आणि ज्ञानगंगेच्या नैसर्गिक अधिवासात आपले क्षेत्र तयार केले.
धुरंधरने या परिसरातील वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतल्याचे वन विभागाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्याने सांबराची शिकार करून जंगलातील नैसर्गिक जीवनशैलीशी जुळवून घेतल्याचेही समोर आले होते.
मात्र, वाघांच्या संवर्धनासाठी केवळ नर वाघाचा अधिवास पुरेसा नसतो. भविष्यात वाघांची संख्या वाढण्यासाठी आणि नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेसाठी मादी वाघिणीची आवश्यकता असते. त्यामुळे वन विभागाने तांत्रिक अभ्यास आणि विविध निकष तपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘मोना’ या वाघिणीची निवड केली.
ताडोबातील ‘मोना’ का ठरली योग्य निवड?
सुमारे २४ महिन्यांची ‘मोना’ ही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक वातावरणात वाढलेली प्रौढ वाघीण आहे. ती सतर्क, धीट आणि स्वतंत्रपणे शिकार करण्यास सक्षम असल्याने ज्ञानगंगा अभयारण्यातील पुनर्वसनासाठी तिची निवड करण्यात आली.
रविवारी रात्री विशेष वाहनातून आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसह ‘मोना’ला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले. तिच्या हालचालींवर आता वन विभागाच्या पथकांकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
खामगाव आणि बुलढाणा वन विभागाच्या संयुक्त पथकांकडून २४ तास निरीक्षण करण्यात येणार आहे. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था आणि निरीक्षणाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
ज्ञानगंगा अभयारण्याला मिळणार नवी ओळख?
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे जैवविविधतेसाठी ओळखले जाते. आता येथे वाघांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सुरू असल्याने या भागाचे महत्त्व आणखी वाढले आहे.
‘धुरंधर’ आणि ‘मोना’ यांच्या माध्यमातून भविष्यात ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वन्यजीव पर्यटनालाही चालना मिळू शकते आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या व्याघ्र संवर्धनाच्या नकाशावर अधिक ठळक होऊ शकते.
दुसरी वाघीण आणण्याचेही नियोजन
वन विभागाच्या नियोजनानुसार ज्ञानगंगा अभयारण्यात आणखी एका वाघिणीचे पुनर्वसन करण्याची तयारी सुरू आहे. तांत्रिक आणि हवामानाशी संबंधित अडचणी दूर झाल्यानंतर पुढील काळात दुसरी वाघीण आणली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
‘मोना’च्या आगमनामुळे आता ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांच्या संवर्धनाची नवी सुरुवात झाली असून, वन्यजीव प्रेमींच्या नजरा या नव्या जोडीकडे लागल्या आहेत.










