नवी दिल्ली : कट्टा न्यूज नेटवर्क टीम
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, गेल्या 36 दिवसांपासून जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात उसळलेल्या असंतोषाचा हा परिणाम मानला जात आहे.
या आंदोलनाला बळ देणारी आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे सोनम वांगचुक यांचं 25 दिवस सुरू असलेलं उपोषण. सरकारने मध्यरात्री मध्यस्थी करत हे उपोषण मागे घ्यायला लावलं होतं. मागण्या मान्य झाल्याचं वांगचुक यांनी जाहीर केलं असलं, तरी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर आगामी काळात याआधीपेक्षाही मोठा, देशव्यापी मोर्चा उभारला जाईल, असा इशारा CJP कडून देण्यात आला होता. दुपारी साडेतीन वाजता CJP शिष्टमंडळाची जितेंद्र सिंह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक ठरलेली असतानाच, त्याआधीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जाहीर झाला. यावरून सरकारवर किती दबाव होता, हे स्पष्ट होतं.
राजीनाम्याची बातमी समजताच जंतरमंतरवर जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. अभिजीत दीपके यांनी आंदोलकांशी संवाद साधताना, “या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत,” असं सातत्याने सांगितलं जात होतं, याची आठवण करून देत हा विद्यार्थ्यांचा विजय असल्याचं आवर्जून नमूद केलं. पिझ्झा-बर्गर खाणारी बेफिकीर पिढी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या तरुणाईनं हा निर्णायक विजय मिळवल्याचं ते म्हणाले.
जंतरमंतरवरील हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहिलं नाही. महाराष्ट्रासह देशभरात विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली. 20 जुलै रोजी मोर्चा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थही राज्यभरात आंदोलनं झाली होती.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता नवीन शिक्षणमंत्री कोण, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच NEET परीक्षा पद्धतीत आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कार्यपद्धतीत ठोस सुधारणा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तुमचं मत काय? विद्यार्थ्यांच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही बातमी शेअर करायला विसरू नका.
📲 ताज्या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा
हे देखील वाचा
















