रिसोड |१२ फेब्रुवारी २०२६
वाकद उपकेंद्र अंतर्गत असलेल्या वाकद, महागांव, बाळखेड, गोहोगांव, वाडी वाकद आणि एकलासपूर येथील शेतीपंपाची लाईन सलग चार दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे गहू, कांदा, हळद आणि इतर हंगामी पिके वाळण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. संबंधित उपकार्यकारी अभियंता संपर्कात नसल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने गांधीगिरी आंदोलन छेडले.
स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे सांगितले. उपकार्यकारी अभियंता राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागत नसल्याचा आणि कार्यालयात गैरहजर असल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. ही गांधीगिरी पद्धतीने केलेली कारवाई असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतीपंपांची लाईन तात्काळ सुरळीत करावी, महागांव आणि बाळखेडसाठी कायमस्वरूपी लाईनमन नियुक्त करावा, प्रलंबित मेंटेनन्स कामे पूर्ण करावीत, तसेच वाकद उपकेंद्रावरून महागांव शेतीपंप लाईनचे आणि धोडप बु उपकेंद्रावरून भापूर व तांदुळवाडी लाईनचे मंजूर काम त्वरित सुरू करावे, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.
वीजपुरवठा ही जीवनावश्यक सेवा असून संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
हे पण वाचा
- रिठा गावातील शेतकऱ्यांचा एल्गार; विद्युत उपकेंद्रात ठिय्या आंदोलन
- रिठद शिवारात चोरांचा सुळसुळाट! स्प्रिंकलर तोट्यांची चोरी; पोलिस तपासावर शेतकऱ्यांचा संताप
- Syngenta नावाखाली बनावट कीटकनाशकांची विक्री; लोणारमध्ये मोठा प्रकार, डॉ. गोपाल बच्छीरे यांची कठोर कारवाईची मागणी
📢 तुमच्या भागातील समस्या आम्हाला कळवा. स्थानिक बातम्या, तक्रारी आणि फोटो-व्हिडिओ Kattanews.in ला पाठवा. तुमचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवू.










