रिसोड| १४ फेब्रुवारी २०२६
रिसोड तालुक्यातील गोहोगाव ते वाकद डांबरी रस्त्याची दुरवस्था गंभीर बनली असून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अपंग युवक निलेश सुरेश हाडे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. गोहोगाव-वाकद रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरला असून प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या रस्त्यामुळे गर्भवती महिला, शालेय विद्यार्थी आणि अपंग नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बुलढाणा जिल्हा हद्दीलगत असलेल्या गोहोगाव गावात जाण्यासाठी असलेला डांबरी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्ता असूनही नसल्यागत अवस्था निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना रिसोड व वाशिम येथे जाण्यासाठी हाच मार्ग वापरावा लागतो. शाळकरी लहान मुलांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
गोहोगाव हाडे येथील रहिवासी निलेश सुरेश हाडे हे अपंग असून त्यांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड येथील उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले होते. १२ फेब्रुवारी २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत काम सुरू न झाल्यास गजानन महाराज मंदिर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. “माझ्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व संबंधित यंत्रणेची असेल,” असे निलेश हाडे यांनी स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी वाशिम, ठाणेदार पोलीस स्टेशन रिसोड आणि पोलिस अधीक्षक वाशिम यांना पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गर्भवती महिलांना उपचारासाठी जाताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संताप वाढत आहे. संबंधित विभागाने वेळीच डांबरीकरण सुरू करावे, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.
Related News:
महावितरण अधिकाऱ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक
कलम 39(1) अंतर्गत सरपंच अपात्र
चिखली-बुलढाणा रोडवर भीषण अपघात












