चिखली (प्रतिनिधी) : विशाल गवई
चिखली शहरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था ते बैल जोडी चौक या महत्त्वाच्या ‘जुना सिमेंट रोड’चे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भूमीपूजन होऊन अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, येत्या ३ ते ४ दिवसांत रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी चिखली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना रीतसर निवेदन सादर केले. या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आली आहे.
श्रीराम नागरी पतसंस्था ते बैल जोडी चौक हा चिखली शहरातील प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे मोठ्या उत्साहात भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, भूमीपूजनानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भूमीपूजन झाले, मात्र रस्ता प्रत्यक्ष कधी होणार? असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनते. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खड्ड्यांमुळे होणारी धूळ, वाहतुकीतील अडथळे आणि अपघाताचा धोका यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.
मनसेने नगर परिषद प्रशासनाकडे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू करावे, अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या प्रशासकीय तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील, असेही मनसेने निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावेळी चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, शहर सचिव अजय खरपास, विभाग प्रमुख बंटी कळमकर आणि तेजराव इंगळे उपस्थित होते.
👉 WhatsApp Group Join करा
संबंधित बातम्या
- कर्जमाफीत पुन्हा त्रुटी; बोगस बियाण्यांपासून पीक विम्यापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं
- बुलढाणा जिल्ह्यात आज पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ताजा अंदाज, पुढील दिवसांतही ढगाळ वातावरण
- वैमानिक होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले; बुट्टा तांड्याच्या २४ वर्षीय स्वप्निलचा अपघाती मृत्यू, सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ











