सिंदखेडराजा (प्रतिनिधी) |३१ मार्च २०६
सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एका मताने निवडून आलेल्या सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर अखेर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
तहसीलदार अजित दिवटे यांच्या निर्देशानुसार ३० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुमताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच काही निर्णय जनहिताच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे गावातील विकासकामांना अडथळा निर्माण झाल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.
तसेच प्रशासनात समन्वयाचा अभाव, विकासकामांमध्ये अनियमितता, सदस्यांशी सहकार्याचा अभाव आणि पारदर्शकतेचा अभाव ही प्रमुख कारणे ठरावात नमूद करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचाही गंभीर आरोप सदस्यांनी केला आहे. या सर्व कारणांमुळे सदस्यांमध्ये नाराजी वाढत गेली आणि अखेर त्यांनी एकत्र येत अविश्वास ठरावाचा निर्णय घेतला.
आज झालेल्या मतदानात विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, मीनाक्षी विनोद म्हस्के, सुनीता सुरेश भालेकर आणि स्वाती शिवानंद खेडेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
दरम्यान, या निर्णयामुळे खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीतील पुढील सरपंचपदासाठी राजकीय हालचालींना वेग येणार असून गावात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे.
👉 संबंधित बातम्या
- पोलीस होण्याचं स्वप्न… पण तिसऱ्याच फेरीत आयुष्य संपलं; पुण्यात भरतीदरम्यान देऊळगाव राजातील तरुणाचा मृत्यू
- मोठी बातमी! पाण्याच्या टाकीत 200 लिटर डिझेल साठा; चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा
👉 अधिक अपडेटसाठी Kattanews.in ला भेट द्या













