राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या

 

शिक्षकांच्या नियुक्त्या

 

 

 

 

राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या….राज्यात ‘पवित्र पोर्टलमार्फत’ पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. १० ऑक्टोबर अखेर १५ हजार उमेदवार प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू झाले आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील १० टक्के राखीव जागा, तसेच अपात्र, गैरहजर असल्याने रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर होणार? याकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त पदांवर शिक्षक भरतीला सुरुवात झाली.

 

 

 

‘रयत’ पदभरती, १६ ऑक्टोबरला सुनावणी

रयत शिक्षण संस्थेमधील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदे भरतीसाठी ८०१ उमेदवारांची शिफारस केली आहे.

मात्र, पदभरतीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने उमेदवारांची नियुक्त्ती मागील सात महिन्यांपासून रखडली आहे. त्यावर येत्या १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. संचमान्यता, तसेच संस्थांकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांच्या जाहिराती यावरून दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची पदे भरणार, याबाबत आकडा निश्चित होईल.

 

 

 

दुसऱ्या टप्प्यांत किती पदे भरणार?

राज्यातील शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास वित्त विभागाने परवानगी दिली होती.

मात्र, त्यानंतरही १० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. यांसह पहिल्या टप्प्यात शिफारस केलेल्यांपैकी अपात्र, गैरहजर तसेच रुजू न होणे यामुळे सुमारे साडेचार ते पाच हजार पदे रिक्त राहणार आहेत.

मुलाखतीसह निवड प्रक्रिया संथगतीने

मुलाखतीसह शिक्षकभरती फेरीमध्ये ४ हजार ७२३ पदांवर नियुक्तीसाठी ७ हजार ८०५ उमेदवारांची शिफारस केली आहे.